My title My title
Brain Storming

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं?

What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं?



विज्ञानातील नवनवीन शोध हे समाज आणि मनुष्यजीवन जीवन सुसह्य करण्यासाठीच असतात. मग तो अगदी सुरुवातीचा विस्तवाचा शोध असो की चाकाचा.


जोपर्यंत विस्तवाचा शोध लागला नव्हता मनुष्य हा कोणतीही प्रक्रिया न केलेलं अन्न खाऊन उपजीविका करत असे. कच्च,अस्वच्छ, बेचव शाकाहार किंवा मांसाहार करून विपरीत परिस्थितीतही मनुष्य तगून आणि त्या भौगोलीक परिस्थितीशी जुळवून घेत होता, मानवजाती टिकून होती.


कालांतराने विस्तवाचा शोध लागला आणि एक मोठी क्रांती घडली. कच्चे अन्न-मांस खाणारा प्राणी आता भाजलेले, शिजवलेले अन्न, मांस खाऊ लागला, थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याला अग्नीची ऊब मिळाली, जीवन सुसह्य झाले.


जाळं करून तो फक्त अंधार नाही तर हिंस्र प्राण्यांपासूनही बचाव करू लागला. आता त्याची अचानक पडणाऱ्या अंधाराची भीतीही दूर झाली होती.


विस्तवानंतरची मोठी क्रांती म्हणजे चाकाचा शोध. मानवजातीच्या उत्क्रांतीतील टप्याची ही एक महत्वाची घटना. चाकाच्या शोधामुळे मानवाला अनेक क्षेत्रात गती मिळाली.


चाकावर चालणाऱ्या गाडीमुळे स्थलांतर करणे सोपे झाले, चाकावर मडके बनवने, फिरते चाकाचा वापर करून पाणी शेंदण्यासारखी कामे सोपी झाली.


विशेष म्हणजे हे दोन शोध लागून क्रांती घडण्यासाठी कितीतरी काळखण्ड उलटून गेला होता, थोडक्यात बदलाची गती खूपच कमी होती.


विज्ञानात जसे नवनवीन शोध लागत गेले तसे ह्या बदलाची गती वाढतच गेली. येथे दोन गोष्टी ध्यानात घेण्यासारख्या आहेत. एक बदल आणि दुसरं म्हणजे बदलाची गती.


एका शतकामध्ये जे बद्दल झाले त्याच्या कितीतरी जास्त गतीने बदल फक्त मागील दहा वर्षात घडले. बदल होणे हे सहाजिक पण बदलाच्या गतीसोबत टिकून राहणे कठीण.


उदाहरनादाखल सांगायचे तर लँडलाईन आणि मोबाईलच्या शोधात कितीतरी वर्षाचे अंतर आहे. पण किपॅडवाला मोबाईल ते टचस्क्रीन आणि त्यापुढील नेक्स्ट जनरेशन मोबाईल हे बदल काही महिन्यातच झाले.


थोडक्यात इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाची गती अगाध आहे आणि यापुढे ती वाढतच जाऊन कुठे घेऊन जाणार हे अनिश्चित.


हा सर्व उपद्व्याप कशासाठी तर एकंदरीत दैनंदिन मानवीजीवन हे अधिकाधिक आरामशीर, सुसह्य व्हावं, कष्ट कमी पडावे यासाठीच.


इंटरनेटचा शोध जरी १९६९ साली लागला पण भारतात आणि तेही साधारण तालुक्याच्या ठिकाणी इंटरनेट पोहचण्यासाठी २००५ वर्ष उजाडले. आजही भारतातील काही अत्यन्त दुर्दम्यप्रदेशात ही सुविधा कदाचित पोहचली नसावी, तो भाग अलहिदा.


आज कळत न कळत, या बदलाची चव चाखत समाज हा इंटरनेटच्या आहारी जाऊन मानवीजीवन हे नेटमय होऊन तुम्ही आम्ही नेटकरी झालो आहोत, हे निश्चित.


विज्ञानाचे शोध हे दुधारी शस्त्रासारखे असतात आणि त्याची कोणती बाजू वापरावी हे आपण ठरवायचे असते.


दूरचित्रवाणीच उदाहरण घ्या. आपल्या सभोवतालच्या जगात घडणाऱ्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक घटनेची इतंभूत माहिती मिळावी, इतर जगाशी आपला एकेरी का होईना संवाद घडावा तसेच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावं ह्या सात्विक कामासाठी दूरदर्शनचा वापर होणे अपेक्षित होते.


पण घडले भलतेच. मूळ उद्देश बाजूला राहून आज दूरदर्शन म्हणचे निवळ मनोरंजनाचे साधन झाले आहे. दिशा भरकटलेलं मनोरंजन, पचनी न पडणाऱ्या भडक बातम्या, विविध पक्षधार्जिणे वाहिन्या, किळसवाणा मनोरंजन व न संपणाऱ्या जाहिराती असे प्रकार घडत आहेत.


हीच गत आज इंटरनेटचीही झाली आहे. इंटरनेटमुळे जग जरी एका खेड्यासारखे वाटत असेल पण त्याच्या अति वापरामुळे समाज दुरावला आहे. ९० च्या दशकात तुरलीक लोकांकडे इंटरनेट होता.


त्याचा प्रसार तळागाळात पोहचला नव्हता त्यामुळे उद्योग आणि कार्यालयीन कामासाठी, इ-मेल साठी त्याचा उपयोग होई. देशी-परदेशी कंपन्याचे पत्रव्यवहार, डाटा ट्रान्सफरसाठी त्याचा खूप उपयोग होई.


तोपर्यंत जास्त वेबसाईट, इ-शॉपिंग असले प्रकार विकसित झाले नव्हते. झपाट्याने वाढणारी माहिती तंत्रज्ञानाची गती बघून कालांतराणे प्रत्येक व्यापारी-उद्योजकाने नेटचा वापर सुरू केला.


आपण त्यात मागे कसे म्हणून सर्वच उद्योग जगतातील कँपन्यानी आपली माहितीची वेबसाईट नेटवर उपलब्ध केली. त्यामुळे इंटरनेट हे फक्त कम्युनिकेशनच्या परिघात राहता त्याच्या कक्षा अफाट रुंदावल्या, आज नेट नको त्या क्षेत्रात वाढत आहे.


आज अस कोणतंच क्षेत्र उरलं नाही जिथे इंटरनेट नाही. त्यातच निरनिराळे अँप्लिकेशन(अँप्प) उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक काम हे आज अँप करत आहेत.


या अप्पच्या नादात विध्यार्थी आपलं डोकंही एक अप्प आणि ते वापरून आपण खूप काही करू शकतो हे विसरले आहे.


रेस्टिंग इज रस्टिंग. आज एकंदरीत सर्वच कामं नेटयुक्त झाल्यामुळे साहजिकच श्रम आणि हालचालीं मर्यादित झाल्या आहेत. बँकेत, सिनेमासाठीच्या तिकीटाच्या रांगा बंद, टॅक्सीसाठी बाहेर जाणे बंद, किराणा सामान घरीच उपलब्ध एव्हढच नव्हे तर चार नेटकरी मित्र एक दुसऱ्याला न भेटता मोबाईलवर गेम खेळू शकतात.


त्यामुळे आंगण किंवा मैदानाची गरज नाही. त्याचाच परिणाम आज मुलांना एखादं छोट गणित जरी विचारलं तर ते आधी मोबाईल हातात घेतात. एखाद्या वाण्याच्या दुकानाचा पत्ता जरी विचारला तर जीपीएस लावतात त्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली आणि संवादाला मर्यादा आली आहे.


मोबाईल सर्वच गरजा पूर्ण करणारा ‘अल्लादिनच्या चिराग’ झाल्यामुले मुलांना आता इतर वस्तूंची गरज उरली नाही. एव्हढच काय जर शेजारी कुणी वारलं तर लगेच व्हाट्सप्प, फेसबुकवर RIP RIPटाईप करून मोकळे.


कॉपी-पेस्टमुळे टाईप करायची गरज नसते. शरीराच्या बौद्धिक तसेच शारीरिक वाढीसाठी श्रम आवश्यक असतात. हल्लीची तरुण मंडळी सर्व कामे मोबाईलवर करतात.


त्यामुळे काही बोटाचा व्यायाम सोडला तर शरीराची पाहिजे तशी हालचाल होत नाही. एखादा खिळा न वापरता गंजून जाण्यासारखा हा प्रकार आहे. बुद्धी, शरीराने श्रमच केले नाही तर त्याचा विकास कसा होणार.


थोडक्यात दुःखी, कष्टी मनुष्यजीवन सुसह्य करणारा नेट हे स्वतः आज एक आजाराच कारण बनले आहे. आजारापेक्षा इलाज भारी असा हा प्रकार आहे. पूर्वी खेड्यातील परिस्थितीत शहरांपेक्षा वेगळी असायची.


पण विद्युतीकरण आणि नेटच्या जाळ्यामुळे हि तफावत कमी झाली. त्यामुळे ग्रामीण, खेड्यातही परिस्थिती वेगळी राहिली नाही. खेड्यातील मुलांना एका दिवसात दीड जीबी डाटासुद्धा कमी पडत आहे. एकीकडे शिक्षणाची बोंब असताना फुकटात मिळणारा हा डाटा एकदरीत पूर्ण दिवस खाऊन जात आहे.


स्वस्तात मिळणारा हा डाटा शेतातील कामातही अडचण बनत आहे. शेतातील कामे, नांगर, वखरणाऱ्या हातात आज फक्त मोबाईल खेळत आहे. गल्लीबोलीत, चावडीवर, कट्ट्यावर आठ-दहा मुलं बसले असतील तर त्यांच्या सर्वांच्या माना ह्या एका ओळीत मोबाईलवर गुंतलेल्या दिसतात.


फेसबुक, व्हाटसप, गुगल आणि गेम यापुढे त्यांना काही सुचत नाही.


आज तंबाखु, दारूच्या व्यसनाइतकंच भयंकर रौद्ररूप या नेटच्या व्यसनान घेतलं आहे.


रोज त्याबद्दल बोललं लिहिलं जात ते या मुळेच. ‘ अति सर्वत्र व्रजते’ तेंव्हा मर्यादेपेक्षा वापर हा व्यसनला जन्म देतो. पुढं हे व्यसन मानसिक आजार बनून पेशन्ट निर्माण करतं.


त्यामुळे आज गरज आहे की आपण सर्वांनी हा धोका लक्षात ठेवून याबद्दल वेळीच पाऊलं उचलून हा अतिरेक थांबवावा. मनाचा ब्रेक सर्वोत्तम ब्रेक, तो लावून फेसबुक व व्हाट्सप्पचा अतिरेक थांबवावा.


इंटरनेट किंवा तत्सम तांत्रिक उपकरनानी कितीही प्रगती केली तरी ती मानवतेची जागा कदापि घेऊ शकत नाही. एखादं यंत्र मनुष्यपेक्षा हुशार होऊ शकत पण त्यात माणुसकी येऊ शकत नाही.


द ग्रेट डिक्टेटरमध्ये चार्ली चॅप्लिन म्हणतो, ‘ लोभाने मानवाचे आत्मे पोखरलेत. जगभर द्वेष पसरलाय.


आपण गति वाढवली, पण स्वतः त्यात कैद झालो. भरपूर उत्पादन करणारी यंत्र आपली सततचा हाव वाढवत बसली.

ज्ञानामुळे आपण सिनिकल झालो.


आपण खूप विचार करायला लागलो आणि आपल्या खूप कमी जानीवा उरल्या. आज आपल्याला यंत्रापेक्षा जास्त मानवतावादाची गरज आहे. हुशारीपेक्षा दयाळूपणाची जास्त गरज आहे.


या शिवाय आयुष्य आणि पर्यायानं मनुष्यजात संपून जाईन. मनुष्याला करायला काम मिळेल, तरुणांना भविष्य आणि वृद्धांना सुरक्षितता देईल अस जग आपल्याला हवंय.


जिथे विज्ञान आणि मानवाचा विकास हातात हात घालून जाईल. असं जग घडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, एकत्र येऊ’.



© प्रेम जैस्वाल,  premshjaiswal@gmail.com

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button